यायचंच म्हणतेस तर जरूर ये
पण येतांना चिमूटभर उजेड आणायला नको विसरुस,
कारण आताशा इथल्या रात्री असतात
जर्दकाळोख्या अन सर्दवादळी.
पुढच्या बागेतली वेल्हाळ फुलपाखरं आठवतात?
मलूल अन फिक्कट होऊन गुमसुम बसून असतात,
खूप सारी फुलांची रोपं आन त्यांना,
जमल्यास मोगरा आणि शेंदरदेठ्या प्राजक्ताची
ओंजळही घेऊन ये.
घरामागचे दोन प्रशस्त वड,
त्यांच्या शितसमंजस सावलीत पाखरं बागडायची
मुळ्या उखडू लागल्यात त्यांच्या,
येतांना धीर घेऊन ये थोडा
रोज थोडं प्रेमानं अंजारशील गोंजारशील
तर बहरतील थकल्या पारंब्यानिशी नव्यानं तेही.
तू नाहीस म्हणून वहीची पानंही सादळलीत
उणेअंशावर गोठावेत थेंब तसे शब्द गोठलेत
येतांना थोडा चेतनउष्मा आण त्यांच्यासाठी.
यायचंच म्हणतेस तर जरूर ये,
कारण हे अस्वस्थ चार भिंतींचं एक छत,
घर व्हावं म्हणून झटणाऱ्या वेड्यांचा
काफीलाही येतोय एव्हढंच.
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा