या गावचा किंवा त्या गावचा
तू पडू नयेस माझं गावं शोधायच्या भानगडीत
मला सगळी गावं आताशा माझीच वाटू लागलीयेत..
कारण इकडे जातीयतेतून कुणाला सपासप कापताना
बघितल्यावर जेव्हढा अस्वस्थ होतो
तेव्हढच दुःख होत मला शेजारच्या मुलांचा
हकनाक गेलेला बळी पाहून..
आणि जराभर अजिबात करमत नाही
एका गोऱ्याने अंदाधूंद फायरिंगने
काही काळ्यांना संपवलेल पाहून.
एखाद्या पाडयात नुकतंच जन्मलेल तान्हूल मूल
किंवा कुठे आडरानात उमललेल गंधूल फूल
मला दोघांकडही बघून हर्षान नाचावसं वाटतं..
शेवटी सगळ्या नद्यांच पाणी सागरालाच जाऊन मिळत...
म्हणूनच तू पडू नयेस माझ गावं शोधायच्या भानगडीत
कारण आताशा मला सगळी गावं माझीच वाटू लागलीयेत....
महेंद्र गौतम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा