त्या दिवशी गुडघे फुटलेल्या पोरासारखं
बदाबदा आभाळ रडत असताना
अचानकच तू उगवलीस?
म्हटलं असं भरदिवसा अंधारून येणं
काहीसं विचित्रच असतं?
चेहऱ्यावरचा लग्नानंतर चा ग्लो
तुकतुकीत तृप्तीनं ओथंबलेला चेहरा
लग्न मानवल्याच्या इस्ततः विखुरलेल्या खुणा
माझ्या उरात मात्र प्रचंड ढगफूटी
एक काळाकभिन्न ढग....
गुडघे फुटलेल्या पोरासारखा बदाबदा गळणारा
म्हटलं कोरडाठाण असलेला हा तिसरा पावसाळा
आता गतकाळातल्या चिंबाळ मृदगंधी क्षणावरच
पुढचं सगळं आयुष्य रेटत राहायच?
तू म्हणालीस पाऊस कोरडा नसतो कधीच..
कोरडी असतात मनं,
आणि दोष मात्र आपण पावसाला देतो..
खरतर शारीर पातळीच्या पलीकडं असतात
हजारभर सुखं ताटकळत आपली वाट बघत .
पण काही हाका ऐकतच नाही कधी आपण.
कॉफीच बिल देऊन तू निघून गेलीस
मी मात्र बसून राहिलो सुन्न
रातराणीच्या सुंगधाला मुकलेल्या
आगकल्लोळ तप्त एकल सूर्या सारखा...
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा