1.
एकदा कच्च सीताफळ तोडल्यावर माय (आजी) हळहळत म्हणाली होती,
आस कच्चमच्च फळ तोडू ने बाबा,
पिकू द्यावं मंग तोडाव कारण एका फळातल्या एका बित किती झाडं असतात..
त्या सगळ्याच झाडाचा आपण जीव घेतो की,
लै मोठ्ठं पाप असतय कच्च फळ तोडण म्हणजे..
तिकडे अतिरेकी हल्ल्यात लहान पोरं मारल्या गेल्यावर अन
इकडे ऑक्सिजन अभावी काही मुलं गुदमरून मेली तेंव्हाही
मी माझ्या अडाणी मायला अजिबात ह्या गोष्टी कळू नाही दिल्यात..
महेंद्र गौतम.
2.
तेंव्हा घरात मुंग्या झाल्यावर आई करायची
पिठाची किंवा साखरेची पखरण मुंग्यांभोवती आणि शिंपायची हळद कुंकूसुद्धा
मग बघत बसायची वाट मुंग्या निघून जाण्याची
पण तिने लावला नाही कधीच चुकूनही खडू.
डास वाढलेत म्हणून मी घेऊन आलो होतो पॉवरबाज गुड नाइट अॅक्टिव
आणि सकाळी उठून बघतो तर मुंड्या मुरगळून लोळागोळा होऊन
मरून पडलेली दिसली अख्खी मुंग्यांची रांगच्या रांग...
आता मी मच्छरदानीत झोपतो..
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा