लहानपणी आजी सांगायची कहाणी कातीन अन वाघिणीची.
पैश्याएव्हढी कातीन घालायची अंडी,
अन अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सुटायची खावं खावं.
जेंव्हा संपायचं जाळ्यातलं अन्न
तेंव्हा कातीन स्वतः वाढून द्यायची स्वतःच शरीर पिलांसमोर.
पिलांना वाचवण्यासाठी खुशीने जायची मरून.
वाघीण जेंव्हा जनायची तीन चार पिलं तेंव्हा प्रसूतीच्या शीणवट्यामुळं भगभग करणाऱ्या पोटाला शांत करण्यासाठी खायची एखादं दुसरं पिल्लू तिचं.
यातलं खरं खोटं कुणाला ठाऊक?
पण आताशा मला तुझ्या अंगावर काळपट पिवळे चट्टे का दिसतायत??
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा