माणसं उभारत आहेत मनोहर मनोरे
जीवनदायीन्या नद्यांच्या काठी.
माणसांनी वितळवायला दिल्यात
बंदुका गुप्त्या आणि तलवारी,
विळ्या फावडी अन् टिकावं करण्यासाठी.
माणसं घालतायत मुंग्यांना साखर
अन् देतायत भुकेल्यांना भाकर.
उगारत नाहीयेत काठी फुत्करणाऱ्या नागावर
किंवा ठेचत नाहीयेत नांगी,
जहर जहाल गर्द काळया विंचवाचीही.
कडक उन्हाळलेल्या चोची घेऊन
हिंडणाऱ्या हवालदिल पाखरांसाठी
माणसं मांडून ठेवतायत रस्तोरस्ती
गार मडक्यात थंड पाणी,
जाळून टाकल्यात त्यांनी आपापल्या गुलेरी.
उचलून घेतायत माणसं कुठल्याही
माणसाचं रडणारं अश्राप मुलं.
माणसं बेभान प्रेम करतायत माणसांवर
आपले आणि इतर असा भेद न करता,
अडीच हजार वर्षां नंतर दूर कुठेतरी
कुणीतरी मंद हसतांना दिसतय का?
-महेंद्र गौतम.
- हे देखील वाचा ✅
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा